Navnath Bhaktisar Adhyay 28 | PDF Download

By Rahul | Last updated on February 1, 2026

Navnath Bhaktisar Adhyay 28 is the twenty-eighth chapter of the book. Reading it is beneficial to get a good wife who will serve you forever. The PDF download link is at the end of the article.

Navnath Bhaktisar Adhyay 28:

श्रीगणेशाय नमः॥

जयजयाजी जगदुद्धारा ॥ अखिल निरंजना निर्विकारा ॥ भक्तमानसचकोरचंद्रा ॥ प्रेमांबुधारा ओसरसी ॥१॥

तरी तूं असतां कृपाळु आई ॥ माय माझे विठाबाई ॥ तरी आतां ग्रंथप्रवाहीं ॥ येऊनियां बैसे गे ॥२॥

मागिले अध्यायीं प्रेमेंकरुन ॥ वैभवीं मेळविला राव विक्रम ॥ भर्तरीसंगमीं पिंगलालग्न ॥ दत्तानुग्रह लाधला ॥३॥

उपरी मृगया करुनी ॥ अवंतिकास्थाना जाऊनि ॥ राजधामीं कनकासनीं ॥ सभामंडपीं बैसला ॥४॥

क्षणैक बैसूनि त्वरितात्वरित ॥ पाकशाळे गेला नृपनाथ ॥ पक्कान्न सेवूनि अंतापुरात ॥ पिंगलागृहीं संचरला ॥५॥

कनकमंचकीं सुमनशेजी ॥ राव बैसवी पिंगला अजीं ॥ षोडशोपचारेंकरुनि पूजी ॥ श्रद्धापूर्वक पिंगला ॥६॥

परम प्रीतीं भावारुढ ॥ रायें दर्शविलें चित्तीं कोड ॥ मग करी कवळूनि स्नेहपाडें ॥ निकट घेत पिंगला ॥७॥

तीतें वामांकी बैसवोन ॥ परम प्रीतीनें घेत चुंबन ॥ वाचेनें म्हणे तुजसमान ॥ अन्य दारा नावडती ॥८॥

अगे पिंगले माझें मन ॥ भावी मम देहींचें ऐक्यरत्न ॥ जैसे मित्र आणि रश्मिचिन्ह ॥ ऐक्यदेहीं मिरवती ॥९॥

कीं राजमौळी तेजें आगळा ॥ द्वितीये शोभली त्याची कळा ॥ तेवीं माते तूं पिंगला ॥ मम चित्तावरी धांवें ॥१०॥

अगे हे पिंगले माझा भाव ॥ पिंगलाभर्तरीं ऐक्यनांव ॥ एकाचि देहीं मज वाढीव ॥ भासे भास शुभानने ॥११॥

जैशी शर्करा आणि गोडी ॥ नामें भिन्न परी ऐक्यप्रौढी ॥ तेवी तूं पिंगला माझे पाठीं ॥ भासे भास शुभानने ॥१२॥

जैसा उदधी आणि लहरी ॥ परी ऐक्यता सागरीं ॥ तेवीं मातें तूं सुंदरी ॥ भास भाससी शुभानने ॥१३॥

ऐसें म्हणूनि परम प्रीतीं ॥ पुन्हां चुंबन घेत नृपती ॥ मग भोगूनि सकाम रीतीं ॥ संतुष्ट चित्तीं मिरवला ॥१४॥

मग विचार सुचला एक गहन ॥ आनंदें बैसती प्रीतीकरुन ॥ बैसल्या पिंगला बोलूनि वचन ॥ विडा त्रयोदशगुणी देतसे ॥१५॥

म्हणे हे महाराजा नृपवरा ॥ मम देहींचे प्राणप्रियेश्वरा ॥ मम मानसचकोरचंद्रा ॥ प्रेमांबु मिरवतसे ॥१६॥

तरी तुम्हां आम्हां गांठी ॥ गांठी गांठिल्या त्या परमेष्ठीं ॥ गांठिल्या परी चित्तदेठीं ॥ ऐक्यभास भासतसे ॥१७॥

जसें लवण उदकी मिश्रित ॥ भिन्न न दावी दृष्टींत ॥ तन्न्यायें ऐक्यचित्त ॥ रावणराणी शोभत ॥१८॥

तरी ऐसा मिश्रित अर्थ ॥ उदया पावला असे ऐक्यचित्त ॥ परी नेणूनि निर्दय परम कृतांत ॥ जगामाजी मिरवतसे ॥१९॥

चित्तीं चित्तभय काया ॥ हरण करीत असे राया ॥ तरी नेणों आपण विषयचिंते या ॥ बुद्धि जरी संचरली ॥२०॥

संचरतां परी एक त्यांतें मातें दिसत उचितार्थ ॥ तुम्हांआधी मातें मृत्यु ॥ सुगम चित्ता वाटतसे ॥२१॥

तरी हें ऐसें इच्छिल्याप्रमाण ॥ ईश्वरसत्ते जरी आलें घडोन ॥ मग परम बरवें दैववान ॥ जगीं असें मी एक ॥२२॥

ऐसें बोलतां शुभाननी ॥ राव ऐकूनि बोले वाणी ॥ नेणों सखे ईश्वरकरणी ॥ पुढील काहीं वदवेना ॥२३॥

मज आधी तूं कामिनी ॥ मृत्यु पावों इच्छिसी मनीं ॥ परंतु नेणों निर्दयपणीं ॥ मित्रात्मज मिरवतसे ॥२४॥

तो कदा न जाणे वेदविधी ॥ सदा वर्ततसे बिघडबुद्धीं ॥ नेणों मज मृत्यु तुज आधी ॥ आल्या काय करशील ॥२५॥

ऐसें ऐकूनि वदे पिंगला ॥ नेणो कैसे असे जी भाळा ॥ रेखिली विधीनें अकळ कळा ॥ कळत नाहीं महाराजा ॥२६॥

परी ऐशा घडल्या गोष्टी ॥ मी राहाणार नाहीं महीपाठीं ॥ देह दाहूनिया हव्यवाटी ॥ गमन करीन तुम्हांसह ॥२७॥

राव ऐकूनि बोले वचन ॥ पुरे आतां तुझे बोलणे ॥ प्राणांहूनि प्रिय कोण ॥ घात त्याचा करवेना ॥२८॥

तरी हे बोल उगलेचि फोल ॥ माझिया तोषाचें करिसी मोल ॥ परी समय येतां तव पाऊल ॥ मागेंचि धांव घेणार ॥२९॥

तरी अनुभव माझिये चित्ता ॥ सहज आहे मजला पाहतां ॥ अगे राज्यासनीं विपुल वार्ता ॥ सेवक श्रवण माझें करविती ॥३०॥

करविती परी कैशा रीतीं ॥ समरंगणींचा भाव दाविती ॥ शत्रुअनली प्राणाहुती ॥ वेंचूं ऐसें म्हणताती ॥३१॥

तरी समय पडतां दृष्टीं ॥ जीवित्व रक्षिती बारा वाटीं ॥ मग कोण कोठील मोह पोटीं ॥ जीवित्वाचा वरिती गे ॥३२॥

तरी हें तैसे तुझें बोलणें ॥ दावीत मातें चांगुलपण ॥ परी समय पडतां अर्थ ॥ भिन्न दुसराचि आहे गे ॥३३॥

कीं बहुरुपियाचे खेळमेळीं ॥ होऊनि बैसती महाबळी ॥ परी ते शूरपणाची नव्हाळी ॥ समरभूमीं चालेना ॥३४॥

कीं श्वानपुच्छाची कैशी उग्रता ॥ परी हार तेचि पडे बळी देखतां ॥ जैसी पालीची दृष्टी देखतां ॥ वृश्चिक नांगी उतरीतसे ॥३५॥

तन्न्यायें तव बोलणें ॥ मातें दिसतें सहज स्थितीनें ॥ ऐसें बोलतां भर्तरीनंदनें ॥ पिंगला वदे स्वामीसी ॥३६॥

म्हणे महाराजा प्राणेश्वरा ॥ या बोलाच वाग्दोरा ॥ कंठीं बांधिला आहे नरा ॥ काया वाचा मानसीं ॥३७॥

तरी आतां व्यर्थ बोलून ॥ नेणो घडेल अर्थ कोण ॥ ईश्वरसत्तेचें प्रमाण ब्रह्मांदिका कळेना ॥३८॥

परी माझिये भावनेऐसें ॥ येत आहे स्वचित्तास ॥ विधवा शब्द शरीरास ॥ लिप्त होणार नाहीं कीं ॥३९॥

जरी म्हणाल कैशावरुन ॥ तरी काया वाचा चित्त मन ॥ तुम्हांलागीं केलें अर्पण ॥ साक्ष असे ईश्वर तो ॥४०॥

तरी ईश्वर तो सत्याश्रित ॥ आहे म्हणती सकळ जगतीं ॥ तरी वैधव्य शब्द जगमुखांत ॥ मातें लिप्त होणार नाहीं कीं ॥४१॥

असो बीज पेरिलें तैसे फळ ॥ दुमकोमादि दावी सकळ ॥ तेवीं माझो चाली सरळ ॥ फळ उमटेल तैसेंचि ॥४२॥

ऐसें बोलूनि निवांतपणीं ॥ स्तब्ध राहिली कामिनी ॥ परी रायाचे अंतःकरणीं ॥ शब्द सदृढ मिरवलें ॥४३॥

मिरवले परी ठेविले मनांत ॥ चमत्कार पाहूं कोणे दिवसांत ॥ असो हे जल्प बहु दिनांत ॥ सारिते झाले प्रीतीनें ॥४४॥

सहज कोणे एके दिवशीं ॥ राव जातसे पारधीसी ॥ मृगुया खेळतां विपिनासी ॥ आठव झाला कांतेचा ॥४५॥

कीं आम्ही उभयतां दोघे जण ॥ बैसलों होतों सुखसंपन्न ॥ तयामाजी मृत्यु बोलोन ॥ निश्चयविलें कांतेनें ॥४६॥

तुम्ही झालिया गतप्राण ॥ तुम्हांसवे करीन गमन ॥ तरी त्या बोलाचें साचपण ॥ आज पाहूं निश्चये ॥४७॥

ऐसी चित्तीं योजना करुन ॥ मृगया करीत फिरे कानन ॥ तों अकस्मात देखिला नयनें ॥ मृग एक नेटका ॥४८॥

राव देखतां तयापाठीं ॥ लागूनि शीघ्र महीं आर्‍हाटी ॥ शीणचि त्या जीवीं बहु मेळथाटी ॥ मृग जीवंत धरियेला ॥४९॥

धरियेला परी हस्तेंकरुन ॥ तयाची ग्रीवा छेदून ॥ मुकुटासह काढूनि भूषणें ॥ रुधिरें अस्त्रें भिजविलीं ॥५०॥

भिजवोनियां सेवकाहातीं ॥ देता झाला शीघ्र नृपती ॥ अन्य भूषणें उभवूनि कांती ॥ सुखासनीं बैसला ॥५१॥

उत्तम छाया पाहून ॥ तयाखालीं नृप जाऊन ॥ उत्तम चीर कनकवर्ण ॥ मृदु गालिचा आंथरला ॥५२॥

तयावरी बैसूनि नृपती ॥ मंडळी दुरावूनि बैसे एकांती ॥ परी रुधिरवस्त्रें जयाहातीं ॥ तयालागीं पाचारी ॥५३॥

म्हणे ही रक्तवस्त्रें घेऊन ॥ सेवका पिंगलेचें गांठीं स्थान ॥ वस्त्रें तीतें गोचर करुन ॥ राव निमाला म्हणावें ॥५४॥

निमाला परी कैसें रीती ॥ जरी पिंगला बोलले उक्ती ॥ तरी व्याघ्र संधांनी जीवित्वआहुती ॥ घेऊनियां पळाला ॥५५॥

ऐसें वदोनि राव भृत्यातें ॥ गुप्त पाठविला अवंतिकेतें ॥ राजसदना जाऊनि भृत्यें ॥ पिंगलेतें विलोकिलें ॥५६॥

मौळीचीरासह सकळ ॥ रुधिरव्याप्त वस्त्रें सबळ ॥ पुढें ठेवूनि करकमळ ॥ जोडूनियां बोलतसे ॥५७॥

म्हणे जी महाराज महीस्वामिनी ॥ मृगया करीत राव काननी ॥ अवचित व्याघ्र जाळींतुनी ॥ उठला राया न कळतां ॥५८॥

मागाहूनि साधूनि उड्डाण ॥ राव धरिला ग्रीवेकारण ॥ धरितांचि हरुनि प्राण ॥ रुधिर पिऊनि पळाला ॥५९॥

आतं त्याचें करुनि दहन ॥ चमू येईल सकळ परतोन ॥ ऐसें पिंगला ऐकून ॥ हदय पिटी आक्रोशें ॥६०॥

हदय पिटूनि महीवरती ॥ भावें आपटी निष्ठुरगती ॥ अहा म्हणूनि केश हातीं ॥ धरोनियां लुंचीतसे ॥६१॥

शब्द करुनि अट्टाहास ॥ हंबरडा मारुनि उदास ॥ पुन्हां महीतें मस्तकास ॥ वारंवार आफळीतसे ॥६२॥

मृत्तिका घेऊनि टाकी मुखांत ॥ म्हणे हा जी प्राणनाथ ॥ कैसे टाकूनि गेलांत मातें ॥ परत्रदेशभुवनासी ॥६३॥

अहा महाराजा प्राणेश्वरा ॥ कूपीं कापिला कैसा दोरा ॥ अहा तव प्रीतीचा मोहझरा ॥ आज कैसा आटला जी ॥६४॥

अहो मम प्राणनाथा ॥ मजविण तुम्हां क्षण गमत नव्हता ॥ प्रीती सोडूनि कैसे आतां ॥ परत्र देशा गमलेती ॥६५॥

ऐसें म्हणोनि आरंबळत ॥ तों अंतःपुरीं समजली मात ॥ स्त्रिया राजाच्या द्वादश शत ॥ आरंबळत पातल्या ॥६६॥

एक हदय पिटिती आपुलें हस्तीं ॥ एक धांवती महीं पडती ॥ एक ऐकतांचि झाली वरती ॥ महीलागीं मूर्च्छित ॥६७॥

एक हंबरडा फोडूनि ऊर्ध्व ॥ म्हणती आमुचा गेला निध ॥ आतां महीतें स्त्रीवृंद ॥ दीनवंत झालों कीं ॥६८॥

ऐसें म्हणोनि आरंबळती ॥ एकमेकींच्या गळां पडती ॥ हदय पिटूनि आपटिती ॥ महीलागीं मस्तक तें ॥६९॥

ऐसा सकळ अंतःपुरांत ॥ कोल्हाळ झाला अदभुत ॥ परी पिंगला दारा प्रीतीं बहुत ॥ शोक करी आक्रोशें ॥७०॥

म्हणे महाराजा निढळवाणी ॥ मज कैसे गेलेत जी सांडोनी ॥ मोहाचा सकळ तरणी ॥ लोपोनियां महाराजा ॥७१॥

बाळाहूनि मोह अत्यंत ॥ मजविषयीं पाळीत होतेत ॥ तो मोह दवडूनि निष्ठुरवर ॥ सांडूनि कैसे गेलांत ॥७२॥

अहो तुम्ही राया सिंहासनी ॥ बैसत असतां राजकारणीं ॥ परी मम स्मरण होतां मनीं ॥ या धांवूनि सदनांत ॥७३॥

ऐसें म्हणोनि धरणीवर शरीर ॥ पिंगला टाकी वारंवार ॥ आजि सकळ सांडोनि राज्यभार ॥ कैसा गेलासी महाराजा ॥७४॥

पाहूनि माझें मुखमंडन ॥ पुन्हां सेविसी राज्यासन ॥ मोह आजि सकळ सांडोन ॥ कैसा गेलासी महाराजा ॥७५॥

अहा पिंगला अंडजखाणी ॥ कोठें गेलीसे मम पक्षिणी ॥ दाही दिशा ओस करोनी ॥ अचर रानीं चरावया ॥७६॥

मम पाडसाची हरिणी ॥ परत्र तृण गोड पाहुनी ॥ तिकडेचि गुंतली लोभेंकरुनी ॥ माझा लोभ सांडोनियां ॥७७॥

अहा मज आंधळ्याची काठी ॥ हिसकूनि नेली निर्दये पोरटी ॥ कीं क्षुधिताची अन्नवाटी ॥ जिंतूनि नेली भणंगें ॥७८॥

अहा राया मजवांचून ॥ तूतें गमत नव्हतें एक क्षण ॥ आज निष्ठुर मन करुन ॥ कैसा गेलासी महाराजा ॥७९॥

अहा राया उत्तम पदार्थ ॥ जो महीलागीं उत्पन्न होत ॥ तो मम आधीं नृपनाथें ॥ भक्षिला नाहीं कधीं कीं ॥८०॥

मातें बैसवोनि निजअंकास ॥ मुखीं ओपीत होता ग्रास ॥ ऐसेपरी सांडोनि प्रीतीस ॥ परत्र कैसे गेलांत ॥८१॥

ऐसेपरी नाना गुण ॥ आक्रंदतसे आठवून ॥ मग ते सेवेकातें पाचारुन ॥ शय्यासाहित्य करवीतसे ॥८२॥

रायमौळीचा चीरमुगुट ॥ परिधानी कबरी अलोट ॥ स्फुरण दाटोनि मग बळकट ॥ उत्तम चीरीं कवळिला ॥८३॥

स्वामीचें वस्त्र परिधान करुन ॥ घेती झाली सतीचें वाण ॥ स्मशानवाटिकेचें साधन ॥ सिद्ध केले तत्काळ ॥८४॥

मग सकळ समारंभासहित ॥ येती झाली स्मशानवाटिकेंत ॥ अग्निकुंडीं विधानें करुन त्यांत ॥ सबळ अग्नि चेतविला ॥८५॥

अग्नि लावितां विधानशक्तीं ॥ दाहूनि वर्तल अंगारनीतीं ॥ धगधगोनि कुंडाप्रती ॥ पावक शक्ति दावीतसे ॥८६॥

ऐसिया प्रकरणीं पेटविला वन्ही ॥ होतां पातली सौदामिनी ॥ अग्निकुंडी शिळा स्थापोनी ॥ निरोप मागे सर्वातें ॥८७॥

सकळां जय देऊन आशीर्वचन ॥ जय जय भर्ता ऐसें म्हणोन ॥ तुझा देह तुज अर्पण ॥ शीघ्रकाळीं होवो कां ॥८८॥

ऐसे म्हणोनि अग्निकुंडांत ॥ सांडिती झाली स्वशरीरातें ॥ परी त्या पावकीं होतां स्थित ॥ गुंडाळोनि गेली सर्वस्वीं ॥८९॥

मग ते याचक अपार जन ॥ धन्य म्हणती तियेकारण ॥ स्वहित केलें पिंगलेनें ॥ स्वामीसवें गमूनियां ॥९०॥

अहा पिंगला ऐसें म्हणती ॥ पवित्र जाया सत्यवती ॥ उदार कर्ण स्वकुळाप्रती ॥ परकुळातें तारील ॥९१॥

भर्तरीपरी करितां परलोक ॥ विव्हळ चित्ती करिती शोक ॥ म्हणती आम्हां प्रजेचें दोंदिक ॥ ईश्वरें कैसें नेलें हो ॥९२॥

ऐसें म्हणोनि आक्रंदती ॥ भर्तरी म्हणोनि आठविती ॥ असो पावकीं दाहोनि सती ॥ लोक निघाले माघारे ॥९३॥

आपुलाल्या सदनीं जाऊन ॥ बैसले असतीं मुख वाळवोन ॥ अहा भर्तरी ऐसें म्हणोन ॥ श्वासोच्छवास सोडिती ॥९४॥

आणि राजसदनीं स्त्रियांचा मेळ ॥ शोक करीत अति तुंबळ ॥ तों येरीकडे विपिनीं नृपाळ ॥ मृगया करुनि येतसे ॥९५॥

तों अस्तासी गेला चंडमणी ॥ रात्र दाटली परम विपिनीं ॥ म्हणोनि राजा उठोनी ॥ नगराप्रती चालिला ॥९६॥

पावकतेजीं देदीप्यमान ॥ हिलाल मागीं प्रदीप्त करुन ॥ जातां भृत्य पाठविला वस्त्रें देऊन ॥ आठव तयाचा पैं झाला ॥९७॥

राव बैसूनि सुखासनीं ॥ येतां मागीं मशाली पेटवोनी ॥ त्यांत चंद्रज्योती शशिसमानी ॥ दिशेलागीं उजळती ॥९८॥

आठव होतांचि म्हणे चित्तांत ॥ अबुद्धिपणें स्त्रियांची जात ॥ नेणों गृहीं कैसी मात ॥ घडोनि आली असेल कीं ॥९९॥

म्यांहीं केलें मूढपण ॥ शोध केला नाहीं आणिका पाठवोन ॥ सकल भ्रांतीत चित्त गोंवोन ॥ पाठीं लागलों मृगाच्या ॥१००॥

परी मातें दिसतें अहित ॥ मूर्खपणा घेतला स्वपदरांत ॥ ऐसी चिंता करीत ॥ अवंतिके पातला ॥१॥

परी यांत श्रोते कल्पना घेती ॥ पिंगला दाहिली पावशक्ति ॥ तेव्हां विक्रम नृपती ॥ शोध कैसा अंतरला ॥२॥

आणि जो भृत्य आला वस्त्रें घेऊन ॥ तेणें कैसें पाहिलें निर्वाण ॥ तरी तो पिंगलेतें वस्त्रें देऊन ॥ आला होता अरण्यांत ॥३॥

परी रायाची न पडूनि गाठी ॥ कटक शोधितां महीपाठीं ॥ मग तो अस्तमान होतां शेवटी ॥ कटकालागीं मिळाला ॥४॥

आणि त्या समयीं विक्रम नृपवरें ॥ सेविलें होतें मातुळघर ॥ मिथुळेस जाऊनि समाचार ॥ सत्यवर्म्याचा घेतसे ॥५॥

मग सुमतिप्रधान चमूसहित ॥ शुभविक्रमरायादि प्रज्ञावंत ॥ सकळ मंडळीही ज्ञानभरित ॥ रायासवें गेली ती ॥६॥

गृहीं तितुकें स्त्रीमंडळ ॥ ग्रामजनादि रक्षपाळ ॥ सकळ अबुद्धि केवळ ॥ ज्यांते शक्ति नातुडली ॥७॥

ऐसा समय आला घडून ॥ तों त्यांतही घडलें अपार विघ्न ॥ पिंगला अबुद्धिपणें रत्न ॥ देहान्त पावली ॥८॥

असो पाहिली मार्गवाट ॥ राव भर्तरी चमूनेट ॥ येऊनि अवंतिकेनिकट ॥ ग्रामद्वारीं संचारला ॥९॥

तंव ते उठोनि द्वारपाळ ॥ रायासमोर झाले सकळ ॥ आश्चर्य मानूनि उतावेळ ॥ रायाप्रती वदताती ॥११०॥

म्हणती परी कैसे रीतीं ॥ नम्रोत्तरें मंजुळ करिती ॥ मुजरे करुनि निवेदिती ॥ पिंगलेचा वृत्तांत ॥११॥

म्हणती महाराज दिनमणी ॥ भृत्य एक आला वनांतूनी ॥ तो दुश्विन्ह वदोनि वाणी ॥ ग्राम बुडविला शोकांत ॥१२॥

परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी ॥ सती पडली सुमति बळी ॥ नरस्वामिनी पिंगला दवडिली ॥ परत्र देशीं गेलीसें ॥१३॥

तरी तियेची करुनि बोळवण ॥ आतांचि गृहीं आले सकळ जन ॥ स्मशानवाटिका झाली भस्म ॥ एक प्रहर लोटला ॥१४॥

ऐसें राव ऐकतां वचन ॥ परम घाबरलें अंतःकरण ॥ मग सुखासनांतूनि उडी टाकून ॥ स्मशानवाटिके पातला ॥१५॥

पातला परी आक्रंदत ॥ अट्टहास्यें शब्द करीत ॥ अति लगबगें धांवत ॥ स्मशानवाटिकेजवळी पैं ॥१६॥

पातला परी चूम मागें ॥ करीत जातसे अति लाग ॥ सकळ कुळवृद्ध योग ॥ रायालागीं कवळिती ॥१७॥

राव जाता स्मशानमहीसी ॥ पहात पिंगलेचे चित्तेसी ॥ रव विरागी होऊनि मानसीं ॥ उडी टाकूं म्हणतसे ॥१८॥

परी ते चमूमेळीचे गृहस्थ थोर ॥ रायासी कवळूनि धरिती समग्र ॥ स्मशानकुंडीचा वैश्वानर ॥ वेष्टूनियां बैसले ॥१९॥

परी राव ते उद्देशी ॥ प्राणघात इच्छी मानसीं ॥ परी वेष्टन पडतां शरीरासी ॥ उपाय कांहीं चालेना ॥१२०॥

मग बैसल्या ठायीं आरंबळत ॥ महीं मस्तकातें आपटीत ॥ हदय पिटूनि शोक करीत ॥ मूर्च्छनेलागी पावतसे ॥२१॥

मूर्च्छा गेलिया पुन्हां उठत ॥ अग्नीं आहुती द्यावया पहात ॥ परी अपार जनांचे वेष्टन बहुत ॥ बळ कांहीं चालेना ॥२२॥

ऊर्ध्व करुनि आपुला माथा ॥ घडी घडी पाहे पिंगलाचिता ॥ अहा म्हणोनि भाळ तत्त्वतां ॥ महीलागीं आफळीतसे ॥२३॥

आफळूनि आठवी पिंगलेचें गुण ॥ म्हणे कैसी वो गेलीस मज सांडून ॥ मातें मृत्युमहीं ठेवून ॥ परत्र कैसी झालीस ॥२४॥

हें पिंगले तुझे मन ॥ गमत नव्हतें मजवांचून ॥ आतां कैसी निष्ठुर होऊन ॥ परत्रदेशीं गेलीस तूं ॥२५॥

हे पिंगले तुझा मी पती ॥ नव्हतों शत्रु होतो या जगतीं ॥ कैसें जल्पूनि कुडेमती ॥ भस्म तूतें म्यां केलें ॥२६॥

अहा मी पतित दुष्ट दुर्जन ॥ मूढमतीनें घेतला प्राण ॥ तरी मी तुझा शत्रु पूर्ण ॥ पति न म्हणें पिंगलें ॥२७॥

ऐसें म्हणोनि अंग धरणीं ॥ टाकी हा हा शब्द करोनी ॥ हदय पिटी दणाणोनी ॥ महीं मस्तक आफळीतसे ॥२८॥

अहा पिंगला म्हणोन ॥ हांक मारी अट्टहास्येंकरुन ॥ अहा पिंगले एकदां तव वदन ॥ मज दृष्टी दावीं कां ॥२९॥

अहा पिंगले परत्रभुवनीं ॥ गेलीस मातें तूं सांडोनी ॥ हदय पिटी दणाणोनी ॥ महीं मस्तक आफळीतसे ॥१३०॥

हें पिंगले आसनीं शयनीं ॥ मज बैसवीत होतीस अंतःकरणी ॥ आतां माझा विसर धरोनि ॥ कैसी राहसी परत्र ॥३१॥

अहा पिंगले तुजवांचून ॥ सर्वत्र मातें दिशा शून्य ॥ अहा पिंगला माझा प्राण ॥ कुडी टाकून गेलासे ॥३२॥

अहा पिंगले तुजवांचून ॥ सर्वत्र मातें दिशा शून्य ॥ शून्यमंदिरीं निद्राशयन ॥ कैसें येईल सांग पा ॥३३॥

अहा पिंगले माझी अधिक ॥ जाणत होतीस तृषाभूक ॥ आतां निष्ठुर मन केलें निक ॥ कैसी सांडूनि गेलीस तूं ॥३४॥

अहा पिंगले माझे शयनीं ॥ होतीस मृदु भाषणें करुनीं ॥ पाहतां उर्वशी दिसे नयनी ॥ संतोष माझा होतसे ॥३५॥

ऐसें पाहूनि सुगंधद्रव्य मी ॥ रुंजी घाली षटपदकामी ॥ ऐसें सुखसरितासंगमीं ॥ सुख कोठें पाहूं आतां ॥३६॥

यापरी पिंगले तव गुण ॥ दयचें भांडार मुक्त करुन ॥ कीं जगाचें करिसी पालन ॥ धर्मानुकूळें सर्वस्वीं ॥३७॥

ऐसिया प्रज्ञेचें पहुडपण ॥ पिंगले कोठें मी जाऊन ॥ ऐसें म्हणूनि धडाडून ॥ धरणीं अंग सांडीतसे ॥३८॥

यापरी सर्व जाणोनि लोक ॥ रायाचा पाहूनि शोक ॥ गहिंवर येतसे आणीक ॥ शोकशब्देंकरुनियां ॥३९॥

कीं तरु मलयागरा ॥ गंधी मिरवती समग्रा ॥ तैसें रायाच्या शोकपारा ॥ शोकें व्याकुळित जाहले ॥१४०॥

असो हा ग्रामांत वृत्तांत सकळां ॥ कळला परी सुखवसा झाला ॥ जैसा प्राण जावोनि आला ॥ शवशरीरा पुन्हां कीं ॥४१॥

मग गांवीचें ग्रामजन ॥ स्मशानाजवळी आले धावोन ॥ परी रायाचा शोक पाहून ॥ तेही तैसेचि होती पैं ॥४२॥

परी तो मायिक सहजस्थितीं ॥ दुःखरहित शोकावरती ॥ जैसे बहुरुपी खेळाप्रती ॥ शूरत्व मिरविती अपार ॥४३॥

कीं गुर्जरदेशीं चाल सधन ॥ रुदन घेती मोल देऊन ॥ तैसे घरचे सर्व जन ॥ येती प्रेतसंस्कार करावया ॥४४॥

तन्न्यायें शोक करीत ॥ राव पडला शोकार्णवांत ॥ न वर्णवे तो आकांत ॥ अल्प येथे वर्णिला ॥४५॥

असो ऐसी रुदनस्थिती ॥ ज्याची त्याला माया चित्तीं ॥ परी ते लोक अभाव नीतीं ॥ समजाविती रायातें ॥४६॥

तुम्ही सर्वज्ञ सकळराशी ॥ बोध करिता अन्य जनासीं ॥ होऊनी गेलें होणारासी ॥ आश्चर्य याचे कायसें ॥४७॥

म्हणती महाराजा भविष्योत्तर ॥ होऊनि गेलें ते होणार ॥ तयाच शोक करणें चतुर ॥ योग्य आम्हां दिसेना ॥४८॥

अशाश्वताचा शोक करणें ॥ तरी काय शाश्वत आपुलें जिणें ॥ पिंगला गेली आपणही जाणें ॥ कदाकाळीं सुटेना ॥४९॥

पहा आपुले पूर्वज अपार ॥ मृत्यु पावले समग्र ॥ एकामागें एक सर्वत्र ॥ गेले न राहिले मेदिनी ॥१५०॥

कीं आजा गेला नातु उरला ॥ ऐसा कोणी पाहिला ॥ तरी अशाश्वताचा घट भरला ॥ रिता होय क्षणमात्रें ॥५१॥

तरी हे सकळ अशाश्वतपण ॥ पूर्ण मानिती ज्ञानवान ॥ तरी तयाचा शोक करुन ॥ व्यर्थ जीवा कष्टवितां ॥५२॥

अहा पाहती जपी तपी ॥ सिद्ध साधक नानारुपी ॥ कोण वांचले देहसंकल्पी ॥ मृत्युभुवनीं महाराजा ॥५३॥

तरी जी जी जाईल घडी ॥ तीं सुखाचीच मानावी प्रौढी ॥ ईश्वरनामीं ठेवूनि गोडी ॥ चित्त स्थिर असावें ॥५४॥

ऐसें बोधितां सर्वही जग ॥ युक्तिप्रयुक्तीं नानाबोध ॥ परी रायाचे हदय चांग ॥ शोककाजळी उजळेना ॥५५॥

मग ते ग्रामीचे सकळ जन ॥ थकित झाले बोध करुन ॥ एकामागें एक उठोन ॥ आपुल्या सदना सेविती ॥५६॥

असो तीही लोटली रात्री ॥ उदया आला गभस्ती ॥ पिंगलाचितेची पाहुनि शांती ॥ पावक झाला अदृश्य ॥५७॥

मग तो मानूनि दुसरा दिन ॥ पुन्हां पातले आप्तजन ॥ उत्तरक्रिया संपादोन ॥ अस्थिमिलन केले तैं ॥५८॥

तें भर्तरीरावें पाहून ॥ चित्तीं विचार करितां पूर्ण ॥ घेऊं देईना अस्थिसंचयन ॥ स्पर्श कोणा न करवी ॥५९॥

आपण बैसूनि चिता रक्षीत ॥ कोणा लावूं देईना हात ॥ मग ते आप्त जन समस्त ॥ पुन्हां गेले माघारे ॥१६०॥

परी तो राव तैसाचि चितेंत ॥ बैसता झाला दिवसरात ॥ अन्नपाणी त्यजूनि समस्त ॥ पिंगला पिंगला म्हणतसे ॥६१॥

मग हें निर्वाणीचें वर्तमान ॥ मिथुळेसी दूत सांगती जाऊन ॥ राव विक्रम करितां श्रवण ॥ निघता झाला तेथोनी ॥६२॥

सत्यवर्मादि शुभविक्रम ॥ विक्रमादि सुमति प्रधान ॥ परम शोकार्णव रचून ॥ अवंतिके पातले ॥६३॥

मग येतांचि स्मशानवाटीं ॥ पिंगला आणूनि चित्तदृष्टि ॥ परम शोकें जाहला कष्टी ॥ शोकसिंधूंत निमग्न ॥६४॥

आठवी सर्व कन्येचे गुण ॥ म्हणें मम हातीचें गेलें निधान ॥ विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न ॥ काळतस्करें नेलें कीं ॥६५॥

अहा माउली उभयकुळांत ॥ तारक झाली भवसरितेंत ॥ पुन्हां दीपाची लावी वात ॥ अदृश्य कैसी झाली वो ॥६६॥

अहा स्त्रीकटकीं अंतःपुरीं ॥ मुख्य मिरवीत होती सज्ञानलहरी ॥ जैसा हस्ती चमूभीतरी ॥ चांगुलपण दावीतसे ॥६७॥

रुपवंत गुणवंत ॥ सर्व लक्षणीं ज्ञानवंत ॥ सूचक सदा सर्वकाळ संगोपीत ॥ चित्त सकळांचे लक्षी कीं ॥६८॥

ऐसे आठवोनि नाना गुण ॥ शोक करी अति दारुण ॥ मग विक्रम नृपति पुढें होऊन ॥ भर्तरीलागीं समजावी ॥६९॥

नाना युक्ति नाना वचन ॥ भर्तरीचें बोधी मन ॥ परी तो नायके पिसाटपण ॥ पिंगला पिंगला वदतसे ॥१७०॥

परी राव बोध करितां उत्तम ॥ लोटून गेला दिन दशम ॥ मग विक्रमें उत्तरक्रिया करुन ॥ शुचिर्भूत जाहला ॥७१॥

यापरी पुढें तेरावे दिवशीं ॥ जातिभोजन दानमानेसी ॥ सर्व उरकोनि राज्यासनासी ॥ घेऊनि राव बैसला ॥७२॥

भर्तरी न सोडी स्मशानवाटिका ॥ धरुनि बैसला अचळ निका ॥ जैसा वृंदे धरुनि हेका ॥ विष्णु बैसला स्मशानीं ॥७३॥

ऐसेपरी अचलपण ॥ मिरवता झाला मित्रनंदन ॥ परि नित्य नित्य विक्रम येऊन ॥ बोध त्यातें करीतसे ॥७४॥

ऐसा बोध करितां नित्य ॥ द्वादश वर्षे लोटलीं सत्य ॥ पर्णतृण भक्षूनि जीवित ॥ उदकआहारें राखिलें ॥७५॥

अहा देवा अनाथनाथा ॥ कैसें केलें त्वां अनंता ॥ पिंगला माझी सगुण कांता ॥ तूतें कैसी आवडली ॥७६॥

ऐसें म्हणोनि नामोच्चार ॥ शोक करीतसे वारंवार ॥ रात्रदिवस चित्तीं विसर ॥ पिंगलेचा पडेना ॥७७॥

कृश शरीर झालें तेणें ॥ कंठी उरलासे प्राण ॥ मुखीं आणूनि हरीचें नाम ॥ शोकें पिंगला वदतसे ॥७८॥

ऐसीं लोटलीं द्वादश वर्षे ॥ शुचिष्मंत झालें शरीर कृश ॥ तें पाहूनियां अति क्लेश ॥ मित्रावरुणी द्रवलासे ॥७९॥

पुत्रमोहाचे अपार भरतें ॥ लोट लोटले चित्तसरिते ॥ मग मित्रावरुणी तुष्टोनि मनांत ॥ अत्रिजानिकटीं पातला ॥१८०॥

तंव तो प्राज्ञिक अत्रिनंदन ॥ मित्रावरुणीस सन्मान देऊन ॥ म्हणे महाराजा कामना कोण ॥ धरुनि येथें आलासी ॥८१॥

येरी म्हणे जी द्विजोत्तमा ॥ ज्ञानलतिकेच्या फलद्रुमा ॥ जाणत असूनि पुससी आम्हां ॥ अज्ञानत्व घेऊनि ॥८२॥

तरी तव शिष्य जो भर्तरी ॥ त्याची कैसी झाली परी ॥ तें हदयीं आणूनि हितातें वरी ॥ विलोकी कां महाराजा ॥८३॥

मग तो महाराजा ज्ञानवान ॥ हदयीं पाहे विचारुन ॥ तों विपत्काळीं शोकेंकरुन ॥ भर्तरीनाथ मिरवला ॥८४॥

अति क्लेश तयाचे पाहून ॥ परम द्रवला मोहेंकरुन । मग मित्रावरुणीतें बोले वचन ॥ चिंता न करी महाराजा ॥८५॥

तुम्हीं जावें स्वस्थानासी ॥ मी भर्तरीचे आहे उद्देशीं ॥ स्वहित करीन चिंता मानसीं ॥ पाळूं नका महाराजा ॥८६॥

माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ ॥ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत ॥ तो महीं भ्रमत करीत तीर्थ ॥ येथें येईल महाराजा ॥८७॥

तो परम आहे प्रज्ञावान ॥ तयासी तेथे पाठवीन ॥ तो नाना प्रयुक्ती करुन ॥ शुद्ध पंथा आणील कीं ॥८८॥

ऐसें बोलता मित्रावरुणीसी ॥ संतोषें मिरवला तो चित्तासी ॥ मग पुसूनी अनसूयात्मजासी ॥ स्वस्थानासी पैं गेला ॥८९॥

यावरी पुढील अध्यायीं कथा सुंदर ॥ अध्यात्मदीपिका मनोहर ॥ मालू सांगे धुंडीकुमर ॥ नरहरीकृपेंकरोनियां ॥१९०॥

दत्त सांगेल गोरक्षनाथा ॥ गोरक्ष येऊनि विरहसरिता ॥ शोषण करील तत्त्वतां ॥ घटोदभवाचे कृपेनें ॥९१॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ अष्टाविंशति अध्याय गोड हा ॥१९२॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय २८॥ ओव्या ॥१९२॥

॥ नवनाथभक्तिसार अष्टाविंशतितमोध्याय समाप्त ॥

Download Navnath Bhaktisar Adhyay 28 PDF:

Loading Viewer...

If You Like This Article, Then Please Share It

DISCLAIMER:

The information on this website is for informational purposes only. We do not guarantee the accuracy of the content.

All views expressed are personal and should not be considered professional advice. Please consult a qualified expert for guidance.

We are not responsible for any actions taken based on the information provided here.